पुणे : ‘देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुणे जिल्हा प्राणी-क्लेशप्रतिबंधक सोसायटीची बैठक गुरुवारी, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त डॉ. बाकरेवान, डॉ. शिवाजी विधाते, डॉ. अनिल देशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, समितीचे सदस्य सुरेश रास्ते, संदीप नवले, नेहा पंचामिया आदी उपस्थित होते. डॉ. कथिरिया यांनी जिल्हा प्राणी क्लेष समितीचे सदस्य व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी गोसंवर्धनासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
‘भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मांमुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गोशाळांना स्वावलंबी करण्यावर भर देणे आवश्यक असून, आदर्श गोशाळांना पर्यंटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,’ असेही डॉ. कथिरिया यांनी नमूद केले.
‘कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गोसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी गाय असावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे,’ असेही त्यांनी सांगितले